अंगणवाडी भरतीप्रक्रिया होणार लवकरच सुरु, भरतीला मिळाला हिरवा कंदील!
Opportunity Opens for Anganwadi Recruitment
अंगणवाड्यांमधील भरती प्रक्रियेसाठी मार्ग मोकळा झाला आहे. महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस पदांच्या भरतीसाठी आदेश दिले आहेत. पुढील शंभर दिवसांत या सर्व पदांची नियुक्ती पूर्ण केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागासाठी शंभर दिवसांचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यानुसार महिला व बालविकास विभागाने रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी नवीन भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
याशिवाय, ज्या मदतनीस उमेदवारांची नियुक्ती ऑगस्ट २०२२ पूर्वी झाली आहे आणि त्या किमान दहावी उत्तीर्ण आहेत, त्यांना सेविकापदावर थेट नियुक्ती दिली जाणार आहे. ही पदोन्नती सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर केली जाईल. त्यानंतर उर्वरित रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून नवीन उमेदवारांची भरती केली जाईल. या भरती प्रक्रियेत ग्रामीण भागातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून, तेथील ग्रामपंचायतींमध्ये त्यांना अर्ज करण्याची संधी असेल. तसेच, महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात स्थानिक उमेदवार अर्ज करू शकतील. पूर्वी फक्त संबंधित वार्डमधील उमेदवारांनाच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून निवडले जात असे. मात्र, नव्या धोरणानुसार संपूर्ण महापालिका क्षेत्रातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे, त्यामुळे या भरती प्रक्रियेत मोठी स्पर्धा पाहायला मिळेल.
महत्त्वाची बाब म्हणजे या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. निवड प्रक्रियेत उमेदवारांच्या शैक्षणिक गुणांकनेलाच महत्त्व दिले जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपली पात्रता तपासून घेऊन अर्ज करण्यास सज्ज राहावे. महिला व बालविकास विभागाच्या या निर्णयामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, अंगणवाडी सेवांचा दर्जाही सुधारण्यास मदत होईल.