प्राध्यापक भरती प्रक्रियेस गती; नवीन गुणांकन पद्धतीचा अवलंब!!
Professor Recruitment Process Accelerated!!
राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापक पदांच्या भरतीस मंजुरी देण्यात आली असून, निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता आणण्यासाठी नवीन कार्यपद्धती लागू केली जाणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवडीसाठी नवीन गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे. या पद्धतीत शैक्षणिक पात्रता, संशोधन आणि अध्यापनाला ८० टक्के गुण दिले जातील, तर मुलाखतीसाठी २० टक्के गुण राखीव असतील. निवडीसाठी उमेदवारांनी एकत्रित १०० गुणांपैकी किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक असेल.
पारदर्शकतेसाठी निवड समितीच्या सर्व बैठकींचे चित्रीकरण केले जाणार असून, निवड प्रक्रियेच्या समाप्तीनंतर ते सीलबंद केले जाईल. मुलाखती झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा पुढील दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल. यामुळे भरती प्रक्रिया वेगवान आणि अधिक पारदर्शक होईल.
ही सुधारित कार्यपद्धती विद्यापीठांमध्ये गुणवत्ताधारित प्राध्यापकांची निवड करण्यास मदत करेल. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यासंबंधीचा अध्यादेश जाहीर केला असून, लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.