महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिरंगाईमुळे शेकडो उमेदवारांना फटका!!
Hundreds of Candidates Affected Due to MPSC Delays!!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा २०२३ परीक्षेचा निकाल तीन महिन्यांपूर्वी जाहीर केला होता. त्यानंतर वैद्यकीय तपासणी देखील पार पडली. मात्र, आयोगाच्या दिरंगाईमुळे पुढील संपूर्ण प्रक्रिया अद्याप रखडलेली आहे. उमेदवारांना पसंतीक्रम सादर करण्याची प्रक्रिया, तात्पुरती यादी जाहीर करणे, भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय देणे यासह अन्य महत्त्वाच्या टप्प्यांवर कोणतीही हालचाल झालेली नाही. परिणामी, राज्यसेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊनही उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
राज्यसेवा गट-अ आणि गट-ब मधील ३०३ पदांसाठी परीक्षा जून २०२३ मध्ये पार पडली होती. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये मुख्य परीक्षा झाली, तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मुलाखती घेण्यात आल्या. ऑक्टोबरमध्ये उमेदवारांची गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. निकालानंतर लवकरच उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम ऑनलाइन सादर करता येतील, असे आयोगाने स्पष्ट केले होते. मात्र, तीन महिने उलटूनही पुढील प्रक्रिया सुरू झालेली नाही. परीक्षेची तयारी दोन वर्षे केल्यानंतरही नियुक्तीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
पुन्हा वैद्यकीय तपासणीची शक्यता?
शासन निर्णयानुसार, वैद्यकीय तपासणीनंतर एका वर्षात नियुक्ती न झाल्यास उमेदवारांना पुन्हा तपासणी करावी लागेल.
त्यामुळे उमेदवारांकडे आता फक्त पाच महिने शिल्लक आहेत.
१ ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर पुन्हा वैद्यकीय तपासणीचा सामना करावा लागेल.
एमपीएससीच्या कार्यपद्धतीमुळे उमेदवारांना मोठा फटका बसत आहे. एका परीक्षेचा निकाल आणि नियुक्ती मिळण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागणे चुकीचे आहे. आयोगाने परीक्षा आणि नियुक्तीची प्रक्रिया ठराविक वेळेत पूर्ण करणे
गरजेचे आहे. राज्यसेवा २०२३ परीक्षेच्या पुढील टप्प्यांची कार्यवाही तातडीने करावी.
– उमेश कोर्राम, स्टुडंट राईट्स ऑफ इंडिया
आयोगाकडून संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी चिंता करू नये. लवकरच पुढील टप्प्यांना गती दिली जाईल.
– डॉ. सुवर्णा खरात, सचिव, एमपीएससी