अकरावी प्रवेशाचा सावळा गोंधळ!-Class 11 Admission Chaos Again!
Class 11 Admission Chaos Again!
अरे राव, इयत्ता अकरावीचा ऑनलाईन प्रवेश पुन्हा एकदा गोंधळात अडकलेला दिसतोय. शिक्षण खातं म्हणतंय की, आता ३० जून रोजी गुणवत्ता यादी लावणार, पण गावात विचारू तसा सवाल सगळ्यांच्या मनात – ही तरी तारीख खरंच पाळणार की पुन्हा “तारीख पे तारीख”?
मुळात हे सॉफ्टवेअरच काहीतरी खेळ करतंय म्हणे – कॉलेजचा कटऑफच नीट दिसत नाहीये. त्यामुळे जी यादी २७ जूनला येणार होती, ती आता पुढं ढकलली आहे. शिक्षण खात्यातले बडे बाबू म्हणालेत की, ३० जूनचा मुहूर्त ठरवलाय, पण खात्री नाय!
राज्यभरात जवळपास ९,४०० पेक्षा जास्त कनिष्ठ महाविद्यालयं आहेत आणि त्यात २१ लाख जागा. पण अर्ज करणारे १२.७१ लाख विद्यार्थी अजूनही प्रतीक्षेतच आहेत. आतापर्यंत फक्त ६० हजार विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झालेत – तेही कोटामधून. मग उरलेल्यांचं काय?
दहावीचा निकाल लागून दीड महिना उलटून गेला तरी एक यादीही नाही आली हातात. शिक्षण खातं फक्त वेळापत्रकं बदलून सांगतंय की, “थांबा, थांबा, येतेच आता!” पण प्रत्येक वेळेस फक्त उशीरच. विद्यार्थी आणि त्यांचे पालक वैतागलेत – काही तरी ठाम आणि पारदर्शक निर्णय हवाय असं सगळ्यांचं म्हणणं आहे.
आता पाहायचं एवढंच – ही ३० जूनची तारीख खरंच यादी घेऊन येते का, की पुन्हा नवीन बहाणा? शिक्षण खात्याने जेव्हा वेळापत्रक जाहीर केलं होतं, तेव्हाच विद्यार्थ्यांना वाटलं होतं, “चला, आता प्रवेश होईल,” पण हे तर सुरूच आहे – “सावळा गोंधळ!”