राज्यात आता अंगणवाड्या प्राथमिक शाळांशी जोडल्या जाणार ! वाचा कशामुळे ?-Anganwadis Linked with Schools!
Anganwadis Linked with Schools!
राज्यातल्या तब्बल एक लाखावर अंगणवाड्या आता थेट प्राथमिक शाळांशी जोडल्या जाणार आहेत. शिक्षण खातं आणि महिला व बालविकास विभागानं एकत्र येऊन ही मोठी पाऊल टाकली आहे. केंद्र शासनाकडून आलेल्या पत्रात या निर्णयाला अधिकृत मंजुरीही मिळाली आहे.
नव्या शिक्षण धोरणानुसार ३ ते ६ वर्ष वयोगटातल्या लहान मुलांच्या शिक्षणावर जास्त लक्ष द्यायचं ठरवलं आहे. यासाठी अंगणवाड्या आणि शाळा एकत्र काम करतील. त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकांसारखं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. SCERT आणि DIET केंद्रांमार्फत हे प्रशिक्षण होईल.
राज्यात १ लाख १० हजार ५२५ अंगणवाड्या आणि १ लाख ८ हजार २३७ शाळा आहेत. त्यातील जवळपास ७९ हजार शाळांमध्ये प्राथमिक वर्ग आहेत. आता या दोघांचा समन्वय साधून लहान मुलांचं पूर्व-प्राथमिक शिक्षण अधिक प्रभावीपणे दिलं जाईल.
ही ‘जोडणी’ कशामुळे महत्त्वाची आहे?
- पहिलीला येणाऱ्या मुलांना आधीपासून शिकण्याची तयारी असेल.
- अंगणवाडी सेविकांना अधिक दर्जेदार प्रशिक्षण मिळेल.
- समग्र शिक्षा योजनेचे लाभ आता अंगणवाड्यांपर्यंत पोहोचतील.
- जिल्हा परिषदांच्या CEO यांच्यावर समन्वयाची जबाबदारी असेल.
कधीपासून सुरू झाले होते हे प्रयत्न?
मार्च २०२१ मध्येच याची सुरुवात झाली होती, पण आता केंद्र सरकारकडून पत्र आल्याने नवीन शैक्षणिक सत्रातच या निर्णयाची अंमलबजावणी वेगात होणार आहे.