विज्ञानगाथेचा शेवटचा अध्याय!-End of a Celestial Era!
End of a Celestial Era!
Table of Contents
विज्ञानाच्या आकाशात दीर्घ काळ तेजाने झळकणारा एक तारा अखेर निखळला. खगोलशास्त्र आणि विज्ञानलेखन क्षेत्रातील अढळ स्थान प्राप्त केलेले डॉ. जयंत नारळीकर यांचे पुण्यातील राहत्या घरी शांततेत निधन झाले. ८६ वर्षांच्या वयात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या निधनानंतरही, त्यांच्या विचारांचा प्रकाश अजूनही समाजाला दिशा देत राहील, याची खात्री आहे.
विद्वत्तेचा आणि विज्ञानप्रसाराचा ध्यास
डॉ. नारळीकर यांचे संपूर्ण जीवन हे ज्ञानासाठी वाहिलेलं होतं. केंब्रिज विद्यापीठातून खगोलशास्त्रात उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी भारतात परत येऊन आपल्या देशाच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक उन्नतीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (TIFR) संशोधनकार्य केले आणि त्यानंतर भारतीय विज्ञानामध्ये एक नवीन पायरी गाठण्यासाठी IUCAA (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) या संस्थेच्या स्थापनेत मोलाचा वाटा उचलला. या संस्थेमुळे भारतात खगोलशास्त्राचे शिक्षण आणि संशोधन एक वेगळी उंची गाठू शकले.
साहित्य आणि विज्ञानाचा सुरेख संगम
विज्ञान केवळ प्रयोगशाळेपर्यंत मर्यादित न राहता सामान्यांपर्यंत पोहोचावे, हे त्यांचे स्वप्न होते. म्हणूनच त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेत विज्ञानकथा, लघुनिबंध आणि ग्रंथरचना केली. त्यांच्या लेखनाची शैली सहज, रसाळ आणि विचारप्रवर्तक होती. त्यांनी विज्ञानाला केवळ आकड्यांचा आणि समीकरणांचा विषय न ठेवता कथनातून माणसांच्या भावविश्वाशी जोडण्याचा प्रयत्न केला.
त्यांची काही महत्त्वाची साहित्यकृती:
-
‘आकाशाशी जडले नाते’ – खगोलशास्त्रातील गूढ विश्व समजावून सांगणारे पुस्तक
-
‘विज्ञानगंगेची अवखळ वळणं’ – विज्ञानप्रवासाच्या मजेदार आणि शिकवण देणाऱ्या आठवणी
-
‘चार नगरांतले माझं विश्व’ – एक प्रांजळ आत्मचरित्र
याशिवाय त्यांनी अनेक विज्ञानकथा लिहिल्या, जशा की ‘प्रेषित’, ‘व्हायरस’, ‘वामन परत न आला’, ‘टाईम मशीनची किमया’, ‘अंतराळातील स्फोट’, अशा कथांनी विज्ञानाला कल्पनाशक्तीच्या पराकोटीवर नेलं.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान
साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान वाखाणण्याजोगे होते. २०२१ मध्ये नाशिक येथे झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. एक विज्ञानलेखक साहित्यविश्वात अध्यक्षपदावर विराजमान होणं ही मोठी गोष्ट होती. त्यांच्या भाषणातून त्यांनी विज्ञान आणि साहित्याचा सुंदर संगम साधला होता.
पुरस्कार आणि सन्मानांचे उजळ पर्व
डॉ. नारळीकर यांच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना १९६५ मध्ये पद्मभूषण, २००४ मध्ये पद्मविभूषण, तर २०१० मध्ये महाराष्ट्र भूषण या राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केलं. याशिवाय अनेक शैक्षणिक व वैज्ञानिक संस्थांनीही त्यांना गौरविले.
त्यांना मिळालेले काही अन्य पुरस्कार:
-
स्मिथ पुरस्कार (१९६२)
-
अॅडम्स पुरस्कार (१९६७)
-
शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार (१९७९)
-
इंदिरा गांधी पुरस्कार (१९९०)
-
कलिंग पुरस्कार (१९९६)
विज्ञानाची जनकथा लिहणारा ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व
डॉ. नारळीकर हे विज्ञानाच्या विशाल विश्वातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी विज्ञानाला लोकभाषेत आणलं, समाजाला विचार करायला लावलं आणि नव्या पिढीला संशोधनासाठी प्रेरणा दिली. त्यांच्या लेखनातून आणि कार्यातून आजही अनेक तरुण वैज्ञानिक तयार होत आहेत. त्यांच्या निधनाने केवळ विज्ञानविश्वातच नव्हे, तर संपूर्ण भारतात एक पोकळी निर्माण झाली आहे.