सरकारचा नवा निर्णय, लाडकी बहीण योजनेत मोठा बदल !
Major Changes in Ladki Behen Yojana!!
महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत मोठे बदल होणार असून, योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी आता आयकर विभागाच्या मदतीने केली जाणार आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा कुटुंबातील महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना मोठा गेमचेंजर ठरली होती, ज्यामुळे महायुती सरकारला चांगले यश मिळाले. निवडणुकीच्या वेळी सरकारने महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता योजनेच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी बदल केले जात आहेत. राज्य सरकारने आतापर्यंत या योजनेसाठी तब्बल 25,250 कोटी रुपये वितरित केले आहेत.
उत्पन्नाची पडताळणी अनिवार्य
राज्य सरकार आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे सामाजिक परीक्षण करणार आहे. विविध योजनांतून लाभ घेत असलेल्या महिलांचीही तपासणी केली जाणार आहे. तसेच, दरवर्षी जून महिन्यात सर्व लाभार्थींनी ई-केवायसी करून आपली माहिती अद्ययावत करणे बंधनकारक असणार आहे.
2 कोटी 41 लाख महिला पात्र, वाढीव रक्कम प्रतीक्षेत
योजनेसाठी आतापर्यंत 2 कोटी 63 लाख महिलांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिलांना लाभ मिळत आहे. निवडणुकीच्या वेळी सरकारने 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप वाढीव हफ्ता मंजूर झालेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी अर्थसंकल्पात यावर विचार केला जाईल असे सांगितले आहे. त्यामुळे मार्च महिन्यात होणाऱ्या बजेट सत्रात महिलांना 2100 रुपये मिळणार का, हे स्पष्ट होणार आहे.